
nuh violence: जातीय तेढ निर्माण करून हिंदू मुस्लिम यांच्यात द्वेष भावना निर्माण करणारे सर्वच आणि भडकाऊ भाषण करून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी संपूर्ण देशाचे वातावरण गढूळ करण्याचे पाप करीत आहेत आणि अशा भडकाऊ, द्वेष पसरविणाऱ्या लोकांपासून आपण सर्व हिंदू,मुस्लिम,शीख आणि इसाई आणि सर्वच जाती धर्मातील भारतीयांनी सावध राहणे गरजेचे झाले आहे. कोणताही धर्म आणि जात एकमेकांच्या विरोधात लढणे,मारणे तसेच दंगली करणे कधीच शिकवत नाही आणि भारतीय संस्कृतीत या द्वेषाचे राजकारण कधीच टिकणार नाही. सामान्य जनतेला बेरोजगारी आणि महागाई या महत्वपूर्ण आणि गरजेच्या विषयांवरून दूर ठेवण्यासाठी हे होत आहे का? असा प्रश्न पडतो.
“मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना हिंदी है हम वतन है हिन्दोस्ताँ हमारा”
हेट स्पीच अस्वीकार्य, ते रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हेट स्पीचच्या प्रकरणांमध्ये लक्ष घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.
नवी दिल्ली : हेट स्पीचप्रकरणांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. हेट स्पीच कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.सर्वोच्च न्यायालयाने नूहमधील दोन्ही समुदायांनी सलोखा आणि बंधुता राखण्याची गरज व्यक्त केली आहे. नूंह मध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी हरियाणाच्या पोलीस महासंचालकांनी स्थापन केलेल्या समितीवरही सर्वोच्च न्यायालयाने विचार केला.
हरयाणातील नूहमध्ये काही दिवसांपूर्वी हिंदू आणि मुसलमानांमध्ये जबरदस्त हिंसाचार उफाळून आला होता. इथली परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी इथे कधीही हिंसाचार उसळू शकतो अशी दहशत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात घर करून आहे.
nuh violence: या हिंसाचारात दोन होमगार्ड आणि एका इमामासह सहा जण ठार झाले होते
नूहमध्ये 13 ऑगस्टला जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एका महापंचायतीचे आयोजन केलं. त्यासाठी तयारी सुरू असून हिंदू समाज मेवातच्या वतीने नूह, फरीदाबाद , पलवल , गुरुग्राम इत्यादी गावातील लोकांना निमंत्रणे धाडण्यात आली आहेत. मुस्लिमबहुल नूह जिल्ह्यात 31 जुलै रोजी विश्व हिंदू परिषदेच्या ब्रज मंडल शोभा यात्रे दरम्यान हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात दोन होमगार्ड आणि एका इमामासह सहा जण ठार झाले होते आणि 88 जखमी झाले होते. यानंतर गुरुग्राममध्येही हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या.
अशी कोणतीही पंचायत घेण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिलेली नाहीये
गोरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की, 7 ऑगस्ट रोजी हातीन , मेवात , सोहना , पलवल आदी गावांतील प्रमुख मंडळी एकत्र आली होती. त्यांनी नूह हिंसाचाराच्या संदर्भात 13 ऑगस्ट रोजी लघु सचिवालयाजवळ असलेल्या किरा गावातील गोशाळेत पंचायत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे .यासंदर्भात मेवात गोरक्षा दलाचे अध्यक्ष बलजीत यांनी सांगितले की, यासाठी त्यांना जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे. मात्र , उपायुक्त धीरेंद्र खडगटा यांनी अशी कोणतीही पंचायत घेण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिलेली नाही असे सांगितले.
इंटरनेट बंदी 13 ऑगस्टपर्यंत वाढवली
नूह जिल्ह्यातील इंटरनेट सेवेवरील बंदी 13 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे . याअंतर्गत जिल्ह्यातील 2G , 3G , 4G , 5G CDMA , GPRS या मोबाईल इंटरनेट सेवा आणि सर्व एसएमएस सेवा (बल्क SRVMS आणि बँकिंग आणि मोबाईल रिचार्ज वगळता) बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .
nuh violence: 28 ऑगस्टला पुन्हा एकदा नूह येथे जलाभिषेक यात्रा काढण्याची घोषणा
विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाने 28 ऑगस्टला पुन्हा एकदा नूह येथे जलाभिषेक यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये हिंसाचार झाल्याने 31 जुलै रोजी ही यात्रा अर्धवट सोडून देण्यात आली होती . विहिंपचे केंद्रीय कोषाध्यक्ष रमेश गुप्ता यांनी सांगितले की, ब्रिजमंडल यात्रा पूर्ण होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. 21 किंवा 28 ऑगस्टला यात्रा होऊ शकते . 28 ऑगस्टला यात्रा पूर्ण करण्यासाठी संघटनेने परवानगी मागितली आहे. यासाठी संघटनेने हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे.